पुणे : ‘भारतीय गणित शास्त्राला एक प्रदीर्घ आणि दैदिप्यमान परंपरा लाभली आहे. चौदाव्या शतकामध्ये केरळमध्ये माधवा हे महान गणिततज्ज्ञ होऊन गेले. त्यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे व संबंधित पुराव्यांमुळे आज आपल्याला गणितासारखा किचकट विषय सोप्या पद्धतीने समजू लागला आहे. गणित विषयामध्ये माधवांचे योगदान बहुमोल आहे,’ असे प्रतिपादन सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील गणित अभ्यासक व प्राध्यापक डॉ. विनायक सोलापूरकर यांनी केले.
पुणे येथील मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित केलेल्या आपटे बंधू स्मृती व्याख्यानमालेच्या ३५ व्या पुष्पात डॉ. सोलापूरकर बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेत ‘माधवा आणि केरळीय गणित’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. या वेळी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., गणिततज्ज्ञ रवी कुलकर्णी, कार्यवाह संजय मालती कमलाकर यांच्यासह विज्ञानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी ‘माधवा व केरळीय गणित’ या विषयावरील पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
डॉ. सोलापूरकर म्हणाले, ‘केरळीय पर्वामध्ये प्रामुख्याने सीमा, विकलन व संकलन या संकल्पनांचा अभ्यास झाला आहे. इ. स ४०० ते १२०० हा अतिशय महत्त्वपूर्ण कालखंड आहे. या कालखंडामध्ये पंच सिद्धांत हस्तलिखिते, महाभास्करीय ब्रह्मस्फुट, सिद्धांत, गणिती सारसंग्रह, बीजगणित, लीलावती अशा अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची निर्मिती झाली आहे. या कालखंडानंतर केरळीय गणित पर्वाचा झाला व यात माधवा, परमेश्वर, नीलकंठ व ज्येष्ठदेव यांसारखे गणित तज्ज्ञ होऊन गेले.’
रवी कुलकर्णी यांनीही या वेळी मनोगत व्यक्त करत गणितातील सूत्रे सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निश्चय म्हात्रे यांनी केले. विनय र. र. यांनी आभार मानले.